केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघात कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाय सुचवले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, आतापर्यंत मदत करणाऱ्यांना ५ हजार रुपये देण्यात येत होते. आता ही रक्कम वाढवून २५ हजार रुपये करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मदत करणाऱ्या व्यक्तींसाठी यापुढे २५ हजार रुपयांची तरतूद
गडकरी म्हणाले, “वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना दंड ठोठावला आणि कायदे कडक केले तरी रस्ते अपघातातील मृत्यू थांबलेले नाहीत. मानसिकता बदलली पाहिजे, नाहीतर आपण या समस्येवर नियंत्रण मिळवू शकणार नाही. शालेय वयातच वाहतुकीच्या नियमांचे शिक्षण दिल्यास सकारात्मक प्रभाव होतो. त्यामुळे मुलांना शालेय जीवनातच वाहतुकीच्या नियमांचे धडे देणे गरजेचे आहे.” गडकरी पुढे म्हणाले, “कोरोना किंवा युद्धात जितके मृत्यू झाले नाहीत, त्यापेक्षा दरवर्षी रस्ते अपघातात मृत्यू होतात. विशेषतः १८ ते ३४ वयोगटातील तरुणांचा यात मोठा समावेश आहे. एका घरातील तरुण अचानक जाणे म्हणजे त्या कुटुंबासाठी प्रचंड संकट असते.” लोकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. गडकरींनी नमूद केले की, “देशात उत्तम रस्ते तयार होतील, पण लोकांना शिस्त नसेल तर या रस्त्यांचा उपयोग होणार नाही. सिग्नल तोडणे, वेग मर्यादेचा भंग करणे, हेल्मेट न लावणे, सिटबेल्ट न बांधणे या सवयींमुळे अपघात वाढतात.”
‘घरी कुणीतरी वाट बघतंय’ हे लक्षात ठेवा – नितीन गडकरी
गडकरींनी अपील केले की, “वाहन चालवताना आपण एका कुटुंबाचा भाग आहोत, याचे भान ठेवले पाहिजे. आई, पत्नी, मुले घरी वाट पाहत आहेत, हे लक्षात घेऊन वाहन चालवावे.” शिक्षण आणि जनजागृती यांची गरज आहे असे गडकरींच्या मते, “शाळांमध्ये वाहतुकीच्या नियमांचे शिक्षण दिल्यास मुलांवर चांगला प्रभाव पडतो. नियम तोडणाऱ्यांना दंड न ठोठावता योग्य शिक्षण देणे अधिक परिणामकारक ठरते.”
अपघात रोखण्यासाठी कडक उपाययोजना: मदतीसाठी वाढीव रक्कम
“कायद्यांची अंमलबजावणी करण्याबरोबरच वाहन चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर दिला पाहिजे. यासाठी केंद्र सरकार अनेक नवीन योजना राबवणार आहे,” असेही गडकरींनी सांगितले. मदत करणाऱ्या व्यक्तींसाठी यापुढे २५ हजार रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांचे समाजात प्रोत्साहन मिळावे यासाठी हा निर्णय घेतला आहे.